
आर्वी : सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला वैतागून हिवरा तांडा येथील शेतकरी अभयसिंग मानसिंग राठोड (५० यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची नोंद आर्वी पोलिसांनी घेतली आहे.
शेतकरी अभयसिंग राठोड यांना मागील तीन वर्षांपासून नापिकीचा फटका सहन करावा लागला. अशातच शेतीसाठी घेतलेले कर्ज वेळीच भरावे असा तगादा वाढोना येथील स्टेट बँकेच्या अधिकार्यांकडून लावला जात होता. तर खासगी सावकाराकडून दोन लाख रुपये घेतल्याने त्याच्याकडूनही पैशांसाठी तगादा लावल्या जात होता. सततची नापिकी आणि कर्ज अदा करण्यासाठी लावल्या जाणारा तगादा याला वैतागून शेतकरी अभयसिंग राठोड यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.
संत्रा पिकानेही दिला दगा
शेतकरी अमयसिंग हे संत्राचेही उत्पन्न घेत. पण संत्राच्या झाडाचा आलेला बहार पूर्णपणे गळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून विवंचनेत होते. अशातच त्यांनी आत्महत्या केली. अभयसिंग यांच्या पश्चात पली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.




























































