वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने फळबागांचे नुकसान ; पपई, केळी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

पवनार : मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला जोरदार सुरुवात झाली. त्यामुळे परिसरातील शेतमालाचे मोठे नुकसान झाले. परिसरात असलेल्या फळबागांना याचा मोठा फटका बसला. एक तास जोरदार झालेल्या वादळी पावसाने अनेकांच्या घरावरची पत्रे उडाली. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी काढून गहू पेरणी केली होती. दोन चार दिवसातच ती गहू काढणीला आला होता मात्र वादळी पावसाने गव्हाची अक्षरश चाळण झाली.

मुधापूर शिवारातील सुरेश इखार यांचा गहू काढणीला आला होता तसेच सुनील निंबाळकर, कुंदन वाघमारे, नारायण देशमुख घनश्याम बोरकर यांचे केळी बागेचेही मोठे नुकसान झाले. घडेची घडे जमिनीवर कोसळल्याने व केळीची पाने फाटल्याने शेतकऱ्यांचे लाखाचे नुकसान झाले आहे.पिक विम्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असल्या तरी त्याचे पंचनामे होतील की नाही याची शंका आहे.

गावातील अनेक घरावरील पत्रे उडाली असून कुटुंबियांसाठी तो एक तास अंगावर काटा आणणारा होता.तलाठी संजय भोयर यांनी पाहणी सुरू केली असली तरी नुकसान भरपाई मिळत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी सुनील निंबाळकर, नारायण देशमुख, कुंदन वाघमारे, सुरेश इखार, वैभव साखरकर, अनुप चंदनखेडे,वसंत सोनटक्के, वासुदेव सावरकर, पंकज खेळकर, वसंत मेहर, कुशब घुगरे, घनश्याम बोरकर यांचेसह अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here