साहित्यात उमटावे आदिवासींचे वास्तदर्शी चित्रण : डॉ.अनुज लुगुन ; सातवे आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन

हिंगणघाट : आदिवासी या देशातील मूळनिवासी जमाती असून आजही अन्यायग्रस्त आहेत. त्यांचे चित्रण वेगवेगळ्या राज्यातील आदिवासी प्रतिभावंत करीत असले तरी ते एकमेकांपासून दूर आहेत. जगात प्रत्येक राष्ट्रांमध्ये आदिवासी आहेत. त्यांच्या साहित्याचे अध्ययन करून आदिवासी लेखकांनी वास्तवदर्शी चित्रण साहित्यातून मांडावे, असे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. अनुज लुगुन यांनी केले. आदिवासी साहित्य व संस्कृती संवर्धन संस्था बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा शाखा वर्धाद्वारे रविवारी दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी हिंगणघाट येथील हरीओम सभागृहातील सातव्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनात ते बोलत होते.

संमेलनाचे उद्घाटन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष यु. एम. तोडसाम तर मंचावर आदिवासी साहित्य व संस्कृती संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनायक तुमराम, विशेष अतिथी डॉ. वि.स.जोग, हिंदी साहित्य समीक्षक डॉ. रेणू बाली, चित्रकार सत्कारमूर्ती भ.मा.परसावळे, संस्थेचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुळसंगे, जिल्हा सचिव विनोद उईके, संस्थेचे केंद्रीय सचिव सुनील कुमरे आदी उपस्थित होते. साहित्य संमेलनातून आदिवासी समाजात क्रांती व जागृती निर्माण होऊ शकते. अशी संमेलने सर्वत्र व्हावीत. अशी अपेक्षा आमदार कुणावार यांनी व्यक्त केली. डॉ.जोग म्हणाले, डॉ. तुमराम यांनी आदिवासी साहित्यात वैचारिक व समीक्षेच्या अंगाने पायाभूत मांडणी केली. ३० वर्षांपासून दोघांची जवळीक आहे. साहित्य संमेलनाने या शतकाला एक नवी दिशा दिली. परसावळे यांनी अनुभव कथन केले. डॉ. बाली यांनी बिरसा मुंडा यांच्या उलगुलान क्रांतीचे शक्तीसामर्थ्य अधोरेखित केले. डॉ. तुमराम यांनी उलगुलानवेध साहित्य संमेलनामागची पार्श्वभूमी विशद केली. उलगुलान व त्यांचा लोकलढा वर्तमानातही कसा आवश्यक आहे, हे पटवून दिले. समारोपीय सत्रात माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, संमेलनाध्यक्ष डॉ. लुगुन, डॉ. तुमराम, सुनील कुमरे, दिलीप कुळसंगे आदींनी मार्गदर्शन केले. रमेश मडावी यांनी संचालन केले. विनोद उईके यांनी आभार मानले. आयोजनासाठी प्रीतम कुमरे, विठ्ठल आत्राम, डी. एम. सलाम, महादेव सिडाम, रमेश मडावी, विनायक सलामे, भालचंद सिडाम, नलीनी सोयाम आदींनी सहकार्य केले.

दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन

डॉ. विनायक तुमराम लिखित ‘गोंडवन पेटले आहे’ आणि ‘डोंगरमाथ्यावरील रात्रींना जेव्हा चेव येतो’ या दाेन कवितासंग्रहांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. हे दोनही काव्यसंग्रह आदिवासी साहित्यात मैलाचे दगड असल्याचे मान्यवरांनी नमुद केले. आकाशवाणीचे निवृत्त उद्घाेषक अशोक जांभुळकर यांनी संचालन तर प्रास्ताविक सुनील कुमरे यांनी केले. चंदा सिडाम यांनी आभार मानले.

प्रेरक परिसंवाद

‘आदिवासीच्या उत्थानार्थ व सशक्तीकरणासाठी बिरसांचा उलगुलान आणि लोकलढा हाच निर्णायक पर्याय’ हा अभ्यासपूर्ण प्रेरणादायी ठरला. अध्यक्षस्थानी रामराजे आत्राम तर प्रशांत सोनोने, सुरेंद्र बुराडे, रामराव झुंजारे, डॉ. विठ्ठल आत्राम, कविता गेडाम, प्रा‌. बालाजी कोडापे, प्रा. प्रदीप हिरापुरे, प्रा. वैशाली तुमराम, तुळशीदास भोयर आदींनी विषयाची मांडणी केली. संचालन डॉ. गजानन सयाम यांनी केले. शाम कुलसंगे यांनी आभार मानले.

अनुभव कथन व कवीसंमेलन रंगले

तिसऱ्या सत्रात आदिवासी चळवळीतील कार्यकर्त्यांचे अनुभव कथन झाले. योगीराज कोहोचाडे व अन्य मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन नलिनी सयाम यांनी केले. रवी कुकुर्डे यांनी आभार मानले. धर्मेंद्र कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन रंगले. नरेशकुमार बोरीकर यांनी संचालन केले. प्रतीक्षा कोडापे, सुरेश भिवगडे, योगीराज कोहचडे, रामराजे आत्राम, रत्नाकर कन्नाके, आम्रपाली पारवे आदींनी आशयसंपन्न कविता सादर केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here