

वर्धा : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना आधार देण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा शेतकऱ्यांच्या जीवनावर कुठलाही प्रभाव होताना दिसत नाही. शासनाच्या योजना असताना यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील तब्बल ११२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे असलेली सततची नापिकी आणि यामुळे वाढता कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांचे जगणे असह्य करीत आहेत. यामुळेच शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलत असल्याचे अनेकवार पुढे आले आहे. मध्यंतरी शासनाच्यावतीने कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पण, उभ्या पिकांची नासाडी कधी वन्यप्राण्यांकडून तर कधी गारपीट, अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटामुळे होत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून वर्धा जिल्ह्याकडे बघितले जाते. पण, या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
सन २००१ पासून आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात तब्बल दोन हजार ४७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी एक हजार २३९ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरवीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर एक हजार २३० प्रकरणे शासकीय मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून तीन प्रकरणी प्रलंबीत आहेत.