

वर्धा : जंगलातून भटकलेल्या चौशिंग्याचे शहरातील भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून त्याला ठार केल्याची घटना शनिवार (ता. १७) सकाळची ६ वाजताच्या सुमारास हरिहर नगर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय विद्यापीठाच्या मागच्या बाजूला घडली. पिपल फॉर अँनिमलचे लालू गिरीपूंजे यांनी घटनास्थळावर जात या चौशिंग्याला उपचाराकरीता करुणाश्रमात घेऊन येत असतानाच त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. परिणामी शहरात कुत्र्यांची संख्या चिंतेचा विषय ठरत चाललेली आहे.
सकाळच्या सुमारास परिसरातील शेतशिवारातून चार्याच्या शोधात चौशिंगा शहरात आला होता. दरम्यान या चौशिंग्याचा पंधरा ते वीस कुत्र्यांनी पाठलाग करीत त्याचे लचके तोडले. यात चौशिंगा गंभिर जखमी होऊन त्याचा पाय तुटला. परिसरातील नागरीकांनी त्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला पण कुत्र्यांनी त्याचे लचके तोडून त्याला गंभीर जखमी केले होते.
या घटनेची माहिती स्थानिक नागरीकांनी पिपल फॉर अँनिमल्सला दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत चौशिंग्याला ताब्यात घेतले मात्र कुत्र्यांनी त्याचे पुर्णपणे लचके तोडल्याने तो चौशिंगा अत्यंत गंभीर परिस्थितीत असल्याने त्याला करूणाश्रमात उपचाराकरीता आनत असताना या जखमी चौशिंग्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. येथील करुणाश्रमातच या हरिणाचा वनरक्षक श्री कनेरी यांनी पंचनामा केला. करूणाश्रम परिसरातच त्याला दफन करण्यात आले.