
वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. UDID (युनिक डिसअॅबिलिटी आयडी) कार्ड आधारशी लिंक करणे आता बंधनकारक करण्यात आले असून, यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
निर्धारित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांचे अनुदान व आर्थिक लाभ थांबण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये सेवा केंद्रांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक दिव्यांग लाभार्थी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना यांचा लाभ घेत आहेत. या योजनांतर्गत मिळणारे मासिक मानधन अखंडित सुरू राहावे, यासाठी सर्व लाभार्थ्यांनी तातडीने UDID कार्ड आधारशी लिंक करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लिंकिंग का आवश्यक?
लाभार्थ्यांची ओळख पडताळणी सुलभ
अपात्र लाभार्थ्यांवर नियंत्रण
योजनांमध्ये पारदर्शकता वाढ
ई-केवायसी कशी कराल?
जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र/ CSC/महा-ई-सेवा केंद्राला भेट द्या
सोबत आधार कार्ड व UDID कार्ड ठेवा
बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) किंवा OTP द्वारे पडताळणी
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लिंकिंग पूर्ण




























































