पत्रकारिता अधिक लोकाभिमुख व्हावी : संजय तिवारी ; मराठी पत्रकार दिनानिमित्त चौथा स्तंभ पुरस्कार समारंभ

वर्धा : वर्धा पहेलवानांचा जिल्हा आहे. यासोबतच वर्धेने चांगले पत्रकारही घडवावे. पुरस्काराचा कार्यक्रम लहान आणि डेव्हलपमेंटवरील चर्चेचा विषय मोठा ठेवावा. पत्रकारांनी राजकीय लोकांऐवजी गरीब, गरजू, शेतकरी, मजूर, सर्वसामान्यांना सांभाळावे. नव्या युगाची आव्हाने पेलली नाही तर पत्रकारिता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पत्रकारांना आज जागृत राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक संजय तिवारी, नागपूर यांनी केले.

स्थानिक धुनिवाले मठ सभागृहात आज 6 रोजी वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मराठी पत्रकार दिन चौथा स्तंभ पुरस्कार समारंभप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खा. रामदास तडस होते. उद्घाटक म्हणून खा. अमर काळे तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी नेते विजय जावंधिया, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर दिवे, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सावंगी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील बुरांडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपा ज्येष्ठ नेते सुधीर दिवे म्हणाले की, पत्रकार शासन, प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम करतो. समाजाचे प्रबोधन करून राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवतो. वर्धा जिल्हा कृषिप्रधान जिल्हा आहे. मात्र, पाण्याच्या नियोजनाअभावी सिंचनाच्या सुविधा शेतकर्‍यांना उपलब्ध होत नाही. जिल्ह्यात धरणाच्या माध्यमातून अनेक पाण्याचे स्त्रोत आहेत. मात्र, प्रशासनासह शेतकर्‍यांची उदासीनताही याला कारणीभूत आहे. जिल्ह्यातील 15 गावांतील दूध उत्पादक शेतकरी उन्हाळ्यात आपली गावे सोडून स्थलांतरीत होत असल्याची माहिती आहे. ही लाजिरवाणी बाब असून, येत्या पाच वर्षात आपण सिंचन हा विषय घेऊन काम करू, असे आश्‍वासन दिवे यांनी यावेळी दिले. दरम्यान, पत्रकार संघाने आयोजित पुरस्कार सोहळ्यात सिंचन आणि शेती यासाठी काम करणार्‍यांना पुरस्कार घोषित करण्याची आशा व्यक्त करीत यासाठी आपण स्व. वामनराव दिवे ट्रस्टच्या नावाने पुरस्कार देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शेतकरी पाणी आणि निसर्गाशी भांडताना दिसतो. पाणी वापरणार्‍या शेतकर्‍यांना सबसिडी दिली जाते मात्र कोरडवाहू शेतकर्‍यांचे काय? ज्वारी पीक पेर्‍याला सबसिडी मागितली. ज्वारीसाठी सरकारने प्रती एकर अनुदान द्यावे, अशी मागणी केली. ना. फडणवीसांकडे खरिपात ज्वारी पेरणीपासून तर कापणीपर्यंत रोहयोच्या माध्यमातून करून द्यावी, अशी मागणी केली होती. विदर्भात ज्वारी आल्यास जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्‍न संपुष्टात येईल. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. 12 हजारांची तूर 7 हजारांवर आली. पिवळा वाटाणा 40 रुपयाने आयात केला जातो. मात्र, हरभरा येण्यापूर्वीच भाव पडायला लागले. मग शेतकर्‍यांचे प्रश्‍न कसे सुटणार, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी उपस्थित केला. शेतकर्‍ यांचे उत्पादन किती वाढले हे न बघता उत्पन्न कसे वाढेल, हे बघावे लागेल. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. पत्रकारांची भूमिकाही यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत जावंधिया यांनी व्यक्त केले. यावेळी संजय इंगळे तिगावकर यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे स्मृती पत्रकारिता पुरस्कार चंद्रशेखर बोबडे (नागपूर), मातोश्री बबीबाई नंदकिशोर जावंधिया स्मृती सामाजिक पुरस्कार सुनीता अलोणे (पळसगाव ड.), चौथा स्तंभ सामाजिक पुरस्कार डॉ. अशोक चोपडे (वर्धा), प्रा. डॉ . प्रवीण वानखेडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार गजानन गावंडे (वर्धा)आणि चेतन व्यास (पुलगाव), पत्रकार प्रशांत हेलोंडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार भास्कर कलोडे (हिंगणघाट), तर पत्रकार मनोज मुते स्मृती पत्रकाारिता पुरस्कार संजय धोंगडे (सेलू) यांना प्रदान करण्यात आला. यासोबतच पत्रकार आशिष पावडे यांचा संघटनेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, संचालन प्रसिद्ध निवेदिका ज्योती भगत यांनी केले. आभार पत्रकार प्रवीण होणाडे यांनी मानले. कार्यक्रमाला पत्रकार व शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

वृत्तपत्राच्या माध्यमातून हौसले बुलंद : तडस

माझे 40 वर्षांचे राजकारण आहे. त्यात 10 वर्षे खासदार राहिलो. पत्रकारांनी मला सांभाळून घेतले. वृत्तपत्राच्या माध्यमातून माझे हौसले बुलंद झाले. सत्कार एका माणसाचा नाही तर त्याच्या कार्याचा होतो. पत्रकार आपल्या लेखणीतून मोठे झालेले मी पाहिले आहे. ना. नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुजलाम, सुफलाम करावे, जिल्ह्यात आयटी पार्क, सिंचनाची सोय करून द्यावी, यासाठी पत्रकारांनी लेखणीतून पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा माजी खा. रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केली.

भविष्यात पहिले बेरोजगार पत्रकार : प्रदीप मैत्र

आज सर्वच क्षेत्र संकटाने वेढले आहे आणि त्यातही सर्वात जास्त मीडिया. येत्या काळात रोजगार हे मोठे आव्हान आहे. न्यूज पेपरची जागा मोबाइलने घेतली आहे. त्यामुळे वाचकांनाही मोठी समस्या येणार आहे. यावर मंथन करण्याची गरज आहे. आपण नव्या टेक्नॉलॉजीत सामावून जाणार आहोत की नाही, यावर विचार करण्याची गरज आहे. विकास फक्त नागपूरचा झाल्याने विदर्भाचा होत नाही. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ येथेही आयटी पार्क व्हावे, सरकारने पत्रकारांसाठी सन्मान निधी जाहीर केला. जीआर निघाला, मात्र त्या दिशेने काम होताना दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पत्रकारांना 20 हजार रुपये पेन्शन मिळावी, या शासन निर्णयाच्या अंमलबजवणीबाबत पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा प्रदीप मैत्र यांनी व्यक्त केली.

लेखणीचा उपयोग समाजाकरिता व्हावा : खा. काळे

समाजाला आरसा दाखवण्याचे काम पत्रकार करीत असतो. मात्र, आज एकही क्षेत्र विश्वासार्ह राहिलेला नाही. शिक्षणाचे पवित्र क्षेत्र, पण शिक्षकांचा आज सन्मान राहिलेला नाही. राजकीय क्षेत्रही विश्‍वसनीय राहिले नाही. शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचे विषय माध्यमातून बेपत्ता आहेत. दररोज शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. वन्यजीवांमुळे शेतीचे अतोनात नुकसान होते. यावर्षी 12 लोकं वाघाच्या हल्ल्यात ठार झालेत. जोपर्यंत शेतकरी जागलीला जात नाही, तोपर्यंत शेतीच वाचवू शकत नाही. दोन दिवस शेतात न गेल्यास वन्यप्राण्यांकडून शेती भुईसपाट केली जाते. त्यामुळे पत्रकारांनी शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचे विषय वृत्तपत्रातून मांडावे. पत्रकारांनी लेखणीचा उपयोग समाजाकरिता करावा, असे आवाहन करीत शेतीसंदर्भातील विषय आपण भाजपा नेते सुधीर दिवे यांच्या मदतीने मार्गी लावू, असे आश्‍वासन खा. अमर काळे यांनी यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here