नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना

वर्धा : शेतात राबतांना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीस शेतकरी बळी ठरतात. अशा प्रसंगी त्यांना आर्थिक मदत देता यावी यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आपत्ती उद्भवल्यास शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत मदत दिली जाते.

शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघातामुले शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास, त्यांच्या कुटुंबास योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये सहाय्य दिले जाते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख तसेच एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेल्या वारसाची नोंद, वारसदाराचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, निवडणुक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला तसेच प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक. अपघात घडल्यानंतर कागदपत्रांसह प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे 30 दिवसाच्या आंत सादर करावा लागेल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here