Home ◼️ संपादकीय हिंदी विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त भव्य फूड फेस्टिव्हल ; देशभरातील खाद्यसंस्कृतीचे सजीव दर्शन...

हिंदी विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त भव्य फूड फेस्टिव्हल ; देशभरातील खाद्यसंस्कृतीचे सजीव दर्शन ! विद्यापीठ परिसरात उत्सवाचे वातावरण

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या २९व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित चार दिवसीय समारंभाचा समारोप शनिवारी (१० जानेवारी) मेजर ध्यानचंद क्रीडा संकुलात आयोजित भव्य फूड फेस्टिव्हलने उत्साहात झाला. सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत चाललेल्या या फेस्टिव्हलमध्ये विद्यापीठ परिवारासह वर्धा शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. या फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा आणि प्रा. कुलदीप चंद अग्निहोत्री यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी कुलसचिव क़ादर नवाज खान, परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेंद्र गादेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

फेस्टिव्हलमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, ओडिशा, दिल्ली आणि महाराष्ट्र आदी विविध राज्यांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आकर्षक फूड स्टॉल उभारले होते. प्रत्येक स्टॉलवर संबंधित राज्यांच्या पारंपरिक आणि लोकप्रिय खाद्यसंस्कृतीचे सजीव दर्शन घडले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पाणीपुरी, भेलपुरी, लिट्टी-चोखा, पुरणपोळी, इलाहाबादची चहा, पिझ्झा, बर्गर, मोमोज, आईस्क्रीम आदी पदार्थांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी विविध स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि त्यांच्या सर्जनशीलतेचे मनापासून कौतुक केले. अशा सांस्कृतिक, सर्जनशील आणि सहभागात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. भविष्यातही विद्यापीठ अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत राहील, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशीष रंजन चौधरी यांनी केले. फेस्टिव्हल अधिक आकर्षक करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बँडचे सादरीकरण, संगीत कार्यक्रम तसेच मुलांसाठी विविध कार्टून पात्रांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हा फूड फेस्टिव्हल हिंदी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक एकात्मता, सर्जनशीलता आणि सामूहिक सहभागाचा अनोखा अनुभव ठरला. त्याचबरोबर वर्धा शहरातील नागरिकांसाठीही हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!