वर्धा : भरधाव वेगातील कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विरुद्ध दिशेने रोडच्या बाजूला जाऊन पलटी होऊन काठावरील सागाच्या झाडावर आदळून अपघात झाला. या घटनेत चालक गाडीत फसून जागीच ठार झाला तर इतर जखमी झाले. ही घटना लादगड शिवारात कोंढाळी रोडवर 30 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान घडली. आशीष मोहन जोशी रा. कारंजा (घाडगे) असे मृत चालकाचे नाव आहे.
फिर्यादी छत्रपती शालीकराम देवासे (39) यांनी त्यांच्या साडभावाची कार क्र. एम.एच. 49 एएस 6418 चालकाकडे देऊन फिर्यादीच्या भाचीला सेलुकाटे येथे सोडून देण्याबाबत सांगितले. फिर्यादीची बहिण सुलोचना हरिष बारंगे तिची नणंद वंदन दिनेशराव काटोले व त्यांची मुलगी हिमानी काटोले या सर्व फिर्यादीची भाजी चैताली बारंगे हिला तिच्या शाळेत नवोदय विद्यालय सेलुकाटे येथे सोडून देण्याकरिता कारंजा येथून दुपारी 12.30 वाजता गेले होते. चैताली हिला शाळेत सोडून कारंजा (घा. ) येथे परत जात असताना सांयकाळी 4.30 वाजता ते 4.45 वाजताच्या दरम्यान, लादगड गावावरून समोर जात असताना चालक आशीष जोशी याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन झाडावर आदळली. या अपघातात चालक जागीच ठार झाला तर फिर्यादीचे नातेवाईक किरकोळ जखमी झाले. जखमींना खासगी वाहनाने कारंजा (घा.) येथील रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी खरांगणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.