
हिंगणघाट : शहरातील पंचायत समिती परिसरातील कवठ वृक्ष जुलै अखेरीस पावसाने कोसळल्याने झाडांवरील पक्षांचा अधिवास सुरक्षीत ठेवून पक्षांचा प्रजनन काळ संपेपर्यंत येथील कवठ वृक्ष जैसेथे ठेवण्याचे आश्र्वासन प्रशासनाने निसर्ग साथी फाऊंडेशन ला दिले होते. मात्र गत चार पाच दिवसांपूर्वी प्रशासनाने दिलेला शब्द फिरवुन झाडाच्या फांद्या कटर नी कापल्या तद्दतच वृक्षाखाली विस्तव पेटवल्याने वृक्षांवर निवासी पक्षांची पिले मृत्यू मुखी पडली तर काही घरटी उद्धवस्थ झाली. प्रशासनाने दिलेला शब्द फिरविल्याचे निषेधार्थ तथा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास्तव निसर्ग साथी फाऊंडेशनने पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले.
हिंगणघाट शहरात गत दहा वर्षांपासून पर्यावरण तथा निसर्गातील पशु पक्षी संवर्धनासाठी निसर्गसाथी फाऊंडेशन कार्यरत आहे. या धरणे आंदोलनात निसर्गसाथी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण कडु, रुपेश लाजुरकर, प्रभाकर कोळसे, गुणवंत ठाकरे, राकेश झाडे, विजयभाऊ थोरात, साई खोब्रागडे, प्रविन कारळक, परिक्षित ढगे, दिनेश मुडे आदी निसर्ग साथी सहभागी झाले होते.


























































