
वर्धा : महिलांचे आरोग्य सांभाळण्यासोबतच वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविले आहे. सुरुवातीला सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकाला सहाशे ते सातशे रुपये सबसिडी मिळत होती. हळूहळू ती कमी होत गेली आणि सिलिंडरचे दर वाढत गेले, आता सिलिंडरचे दर ९५१.५० रुपये असून, सबसिडी मात्र ४०.१० रुपये मिळत आहे. बऱ्याच ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याने, सबसिडी बंदही नाही अन् ग्राहकांच्या पदरात पडतही नाही, अशी अवस्था झाली आहे.
गेल्या वर्षभराचा विचार केल्यास सिलिंडरचे दर महिन्याला २५ ते ५० रुपयांपर्यंत वाढत आहे. जानेवारी महिन्यामध्ये ७४६ रुपयांना मिळणारे सिलिंडर नोव्हेंबर महिन्यात ९५१.५० रुपयांवर पोहोचले, तर सबसिडीचा विचार केल्यास सबसिडी मात्र ४०.१० रुपयेच मिळत आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत २०५.५० रुपयांची सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे, पण सबसिडी वाढली नाही, उलट अनेकांच्या बँक खात्यात ती जमा होत नसल्याने सबसिडी बंद झाली की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. सिलिंडरची भाववाढ होत असतानाही विरोध होत नसल्याने शासनही ही सबसिडी बंद करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते.
हजाराचा गॅस सिलिंडर, सबसिडी नाममात्र
कोरोनामुळे अनेकांचे अर्थकारण बिघडले आहेत. अशातच नागरिकांना पेट्रोल, डिझेलसह सिलिंडरच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे. जानेवारीपासून तर नोव्हेंबरपर्यंत सिलिंडरच्या किंमतीमध्ये २५ रुपयांनी वाढ होऊन ९५१.५० रुपयांवर पोहोचली आहे. जवळपास २०५.५० रुपयांनी दरवाढ झाली आहे. सबसिडी ४०.१० रुपये पिळत असल्याने ही सबसिडी नाममात्र ठरत आहे.